Leftover Men | चीनमध्ये नवरी मुलींचा भीषण दुष्काळ, जवळपास तीन कोटी पुरुष बिनलग्नाचे..

चीनमधील ‘लेफ्ट ओव्हर मेन’ ( Leftover Men ) एक भीषण समस्या.. 

चीनमधील ‘वन-चाइल्ड पॉलिसी’ (आता रद्द झालेली) आणि मुलांना प्राधान्य देणाऱ्या सांस्कृतिक मानसिकतेमुळे देशात लिंग असंतुलनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सुमारे 3 कोटी चीनी पुरुषांना जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. या पुरुषांना ‘लेफ्टोव्हर मेन’ ( Leftover Men ) असे संबोधले जाते. परिणामी, परदेशी नवरींची मागणी वाढली आहे, विशेषत: बांगलादेश सारख्या देशांमधून.! मात्र, यामागे बेकायदा मानव तस्करी आणि फसवणुकीचे जाळे कार्यरत आहे. विशेष म्हणजे चीनमधील लिंग असंतुलन इतके तीव्र आहे की, 2020 मध्ये पुरुष आणि महिलांचे प्रमाण 118:100 होते, जे जगातील सर्वात जास्त लिंग असंतुलनांपैकी एक आहे.

Leftover Men

परदेशी नवरींच्या फसवणुकीपासून सावध राहा: चीनच्या दूतावासाचा बांगलादेशात इशारा.

चीनमधील लग्नदर कमी होत असताना आणि ‘लेफ्ट ओव्हर मेन’ ( Leftover Men ) च्या समस्येमुळे परदेशी नवरींच्या फसवणुकी विरोधात चीन ची कठोर पावले..

बांगलादेश मधील चीनी दूतावासाने नुकताच एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये चीनी नागरिकांना परदेशी मुलींशी विवाह करताना कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. विशेषत: शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म वरून होणाऱ्या बेकायदा मॅचमेकिंग एजंट्स आणि क्रॉस-बॉर्डर डेटिंग कंटेंट च्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या इशाऱ्यामागे चीनमधील वाढती मानव तस्करी आणि दुसऱ्या देशातील नव–वधूच्या आमिषाने फसवणुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, जी चीनमध्ये कमी होत असलेल्या लग्न दरांमुळे आणि सामाजिक-सांस्कृतिक आव्हानांमुळे आणखी गंभीर बनली आहे.

बांगलादेशातील फसवणूक :

लग्नाच्या नावाखाली मानव तस्करी ‘द डेली स्टार’ च्या अहवालानुसार, बांगलादेशातील अनेक महिलांना लग्न, आकर्षक नोकरी किंवा शिक्षणाच्या संधींच्या नावाखाली चीनमध्ये नेण्यात येते. मात्र, या महिलांना बेकायदा टोळ्यांद्वारे चीनी नागरिकांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते किंवा त्यांचे शोषण केले जाते. अशा विवाहांमागे बेकायदा आणि शोषणकारी हेतू असतात, ज्यामुळे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. चीनच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदा मॅचमेकिंग एजन्सींना चीनी कायद्यांतर्गत बंदी आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था फसवणूक किंवा नफ्यासाठी अशा क्रॉस-बॉर्डर विवाह मॅचमेकिंगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बांगलादेशातील न्यायप्रक्रिया देखील या बाबतीत कठोर आणि दीर्घकाळ चालणारी आहे. मानव तस्करीच्या संशयावरून कोणाला अटक झाल्यास, प्रकरण पोलिस तपासापासून ते कोर्टाच्या निकालापर्यंत काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. याचा थेट परिणाम कुटुंब पुनर्मिलन आणि दीर्घकालीन जीवनाच्या प्लॅनिंगवर होतो.

बांगलादेशातील कायदा आणि त्याचे परिणाम..

बांगलादेशच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग कायद्यानुसार, मानव तस्करी आयोजित करणाऱ्यांना किमान सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, जी आयुष्यभर तुरुंगवास किंवा मृत्युदंडापर्यंत वाढू शकते. तसेच, तस्करीला प्रोत्साहन देणाऱ्या, नियोजन करणाऱ्या किंवा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 20,000 टका पर्यंत (सुमारे 14,000 रुपये) दंड होऊ शकतो.

दूतावासाचा सल्ला:

सावध राहा, फसवणुकीला बळी पडू नका.. चीनच्या दूतावासाने चीनी नागरिकांना व्यावसायिक क्रॉस-बॉर्डर मॅचमेकिंग एजन्सींपासून दूर राहण्याचा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
“परदेशी नवरी खरेदी” करण्याच्या विचाराला पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, बांगलादेशात सुद्धा मुलींच्या बाबतीत लग्न करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्यास सांगितले आहे. जर कोणी लग्नाचे आमिष किंवा विवाहाशी संबंधित फसवणुकीला बळी पडला असेल, तर त्यांनी तातडीने चीनच्या सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे दूतावासाने सुचवले आहे.

सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हाने..

चीनमधील ही समस्या केवळ कायदेशीर नाही, तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक आहे. कमी होत असलेले लग्नदर, लिंग असंतुलन आणि ‘लेफ्टओव्हर मेन’ ( Leftover Men ) यामुळे परदेशी नवरींची मागणी वाढली आहे. मात्र, यामुळे मानव तस्करी आणि बेकायदा विवाहांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे केवळ व्यक्तींचे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होत नाही, तर दोन्ही देशांमधील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.

चीनच्या दूतावासाचा हा इशारा एक महत्त्वाचा संदेश आहे की, विवाहासारख्या पवित्र बंधनाला फसवणुकीचे साधन बनवू नये. परदेशी नवरींच्या नावाखाली होणारी मानव तस्करी रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि सामाजिक जागरूकता आवश्यक आहे. चीनी नागरिकांनी सावध राहून आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपले भविष्य सुरक्षित ठेवावे.

ज्या देशामध्ये मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीये, जिथे मुलींना आपल्या करिअर मुळे लग्न करण्याची इच्छा नाही तो देश कालांतराने म्हातारा होत जातो (जसे की जपान, इटली) आणि त्या देशाचे भविष्य देखील अंधारात असते या मुळेच चीन या बाबतीत बऱ्याच उपाय योजना करताना दिसत आहे.

संदर्भ: ग्लोबल टाइम्स, द डेली स्टार

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..